Saturday, 4 April 2015

जीवन गणित

दीपत्कार
November 6, 2014 at 6:42pm ·
" जीवन गणित "

शालेय जीवनात वेगवेगळे विषय शिकविले जातात. ते शिकवण्याचा मुख्य हेतू मनुष्याने साक्षर होऊन त्या विषयाचे सखोल ज्ञान घेऊन पारंगत होण्याचा असतो. हे शिकलेले विषय पुढील आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर नक्कीच भेटतात. भाषा , विज्ञान , इतिहास , भूगोल आणि गणित हे मुख्य विषय. प्रत्येकाच्या कलानुसार कोणता ना कोणता विषय हा आवडीचा असतो. पण एकूणातच विचार केला तर असे आढळून येते की गणित हा विषय बहुतेकांच्या यादीत नावडता विषय क्रमांक एकवर आढळतो.

परंतु गणित विषयाच्या सहाय्याने तर मानवाने मोठमोठी संशोधने केली आहेत. सुर्यमालेतील विविध ग्रहांचे आकारमान , वस्तुमान , सुर्यापासूनचे अंतर , प्रकाशवर्ष , मोठमोठाल्या इमारतींचे नियोजनबद्ध आराखडे , विविध यंत्रे गणितातील विविध परिमाणे वापरून सहजसाध्य केले. भारताने जगाला शून्य ही महत्त्वपूर्ण संख्या दिली. जिच्या सहाय्याने दशमान पद्धत जगभरात परिचित झाली. शकुंतलादेवीसारखी मानवी संगणक असणारी थोर भारतीय महिला तर गणितातील एक अद्भुत विदुषी होती. अत्यंत अवघड गणिते ती चुटकीसरशी सोडवित असे. आपल्याला मिळालेल्या निसर्गदत्त , उपजत गुणवत्तेचा योग्य वापर करून तिने गणितात विशेष प्राविण्य मिळवले होते. असा हा विषय नावडता कसा होऊ शकतो?

माझ्या मते अवघे आयुष्य हेच एक गणित आहे. नवीन कोणी जन्माला आला की बेरीज होते. एखादा मनुष्य या जगातून निघून गेला की वजाबाकी होते. लग्न झाले की अनेक नाती जुळली जातात आणि नात्यांचा गुणाकार होतो. हीच नाती तुटली की मात्र नात्यांचा भागाकार होतो. आयुष्याचे हे गणित ज्याला समजते तो तयार होणारी नाती जपण्याचा प्रयत्न करतो. त्यातून आनंद मिळवतो कारण त्याला माहित असते की नात्यांतून मिळणारा आनंद हा सम प्रमाणातील गुणोत्तराप्रमाणे वाढतच जातो !!

No comments:

Post a Comment