Saturday, 4 April 2015

बदल

दीपत्कार
November 19, 2014 at 6:25pm ·
बदल

मानवी आयुष्य इतके गुंतागुंतीचे आहे की बर्याचशा गोष्टी ठरवून सुद्धा होत नाहीत. तर काही अनपेक्षितपणे समोर येतात आणि मनाला सुखावून जातात. काहीजण अगदी वेळेचे नियोजन करून , ध्येय ठरवून आपली मार्गक्रमणा करतात. यात ध्येयपूर्ती झालेली माणसे यशस्वी ठरतात. ध्येयपूर्तता न झालेली अपयशी होतात. पण त्यातही अपयशापासून धडा घेऊन नव्याने उभारी घेऊन परत ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू करतात. काहींच्या समोर तर काहीच ध्येय नसते. आला दिवस ढकलायचा , गेलेल्या दिवसाचे दुःख नाही , येणार्या काळाची चिंता नाही असे मजेत यांचे चाललेले असते. त्यामुळे अनपेक्षितपणे एखादे संकट आले की मात्र यांचा गोंधळ उडतो. त्यावेळी मात्र आता हालचाल केली पाहिजे नाहीतर खरे नाही हे अशांना कळून चुकते. यातून तावून सुलाखून मार्ग काढून परिस्थितीवर मात करणारी माणसेच पुढील आयुष्यात आपले जीवन सुखकर करू शकतात. नाहीतर अपेक्षाभंग हा ठरलेलाच.

घोडा का अडतो? पान का नासते? व भाकरी का करपते? या तिन्ही प्रश्नांचे एकच ' न फिरवल्यामुळे म्हणजेच न बदलल्यामुळे'. बदल हाच आयुष्यातील स्थायीभाव आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टीतच मानव गुंतून राहिला असता तर आजवर केलेली प्रगती त्याला साध्य करता आली नसती. माकडापासून उत्क्रांती होऊन मानवात झालेले रूपांतर हाही या बदलाचाच एक भाग. बदलाची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच आपल्या रोजच्या जीवनक्रमात बदल करणे. डार्विनचा उत्क्रांतीविषयीचा सिद्धांत हा बदल याच तत्त्वावर आधारलेला आहे. परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेऊन आपल्यात बदल घडविणे किंवा प्राधान्यक्रम बदलणे याचे भान ज्याला असते तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो , जीवनप्रवासात तरून जाऊ शकतो. नाहीतर गटांगळ्या खाणे नशिबी आलेच. तसेही काही बदल आपोआप घडून येतात. पण जाणीवपूर्वक बदल घडवून आणून आपले जीवनक्रम बदलणाराच यशस्वी ठरतो !!

No comments:

Post a Comment